आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *५*

*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *५*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
        *मला कोणीही अंधभक्त नको आहे* ज्या लोकांना बौद्ध धम्मात यायचं आहे त्यांनी संपूर्ण विचार करून बौद्ध धम्माचा स्वीकार करावा. ज्यायोगे ते या धम्माचे कट्टर अनुयायी होतील. मनुष्यमात्राच्या प्रगतीसाठी धर्माची आवश्यकता असते. मला हे चांगल्याप्रकारे माहित आहे की कार्ल मार्क्सच्या सिध्दांतानुसार एक नवे मत तयार झाले आहे. त्याच्या कथनानुसार धर्मामध्ये काहीही नाही. त्यांच्यासाठी धर्माचे काहीही महत्त्व नाही. त्यांचा धर्म केवळ असा आहे की, *सकाळी नाष्ट्यासाठी लोणी लावलेला टोस्ट खाणे,दुपारी स्वादिष्ट भोजन खाणे, झोपण्यासाठी मखमली बिछाना व पाहण्यासाठी सिनेमा असं त्याचं तत्वज्ञान आहे.* मला असलं तत्वज्ञान पटत नाही. माझ्या वडिलांच्या दारीद्री अवस्थेमुळे मला असलं कुठलही सुख प्राप्त झाले नाही. माझ्या आयुष्यात जितके कष्ट, यातना मी सोसल्या आहेत. तेवढं कुणीही सोसलं नसेल. म्हणूनच *गरीबांचे जीवन किती कष्टप्रद असते याचा मला अनुभव आहे. आर्थिक बाजू समोर ठेवूनच आमचे आंदोलन सुरू आहे. आणि म्हणूनच मी आजपर्यंत आपल्या लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी संघर्ष करीत आहे. फक्त एवढचं नव्हे तर संपूर्ण मानवजातीची आर्थिक प्रगती झाली पाहिजे.*
       या संदर्भात माझे स्वतःचे विचार आहेत,मनुष्यात व प्राण्यात खूप अंतर आहे. प्राण्यांना रोज खाण्यासाठी चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु *मनुष्याला अन्न पाहिजे.* प्राण्यांना चाऱ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. परंतु *मनुष्याला शरीराबरोबर मन ही असते* या दोन्ही गोष्टींवर विचार करण्याची जरूरी आहे. *मन पवित्र व सुसंस्कृत बनविणे जरुरीचे आहे.* अशा प्रकारेच शरीराला सुदृढ बनविण्यासाठी मन सुसंस्कृत असणे जरुरीचे. अन्यथा असं म्हणणे निरर्थक होईल की मनुष्य प्रगती करतो आहे.
       *मनुष्याचे शरीर अथवा मन रोगी का बनते?* त्याचे कारण आहे की, मनुष्याला जोपर्यंत शारीरिक कष्ट असते तोपर्यंत त्याचे मन प्रसन्न राहत नाही. मनात उत्साह नसेल तर अभ्यूदय होऊ शकत नाही. मग उत्साह न राहण्याचे कारण काय? याचे कारण हे आहे की, मनुष्याला असा विश्वास आला आहे की, पुढे जाण्यासाठी अवसरच दिला जात नाही. म्हणजेच त्याच्या मनात आशाच नाही, तर उत्साह कोठून येणार? *तो मानसिक रोगी आहे.* ज्या व्यक्तीला आपल्या कर्माचे फळ मिळते त्यालाच आनंद मिळतो. जर शाळेमध्ये शिक्षक असे म्हणू लागले की, हा कोण तर चांभार हा कसा पहिल्या वर्गात पास झाला, याला पहिला वर्ग कशासाठी पाहिजे? कारण फक्त ब्राह्मणच पहिल्या वर्गात पास होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्या चांभार विद्यार्थ्याला उत्साह कसा मिळेल? त्याची प्रगती कशी होईल. *उत्साह निर्माणाचे मुळ कारण मन आहे. ज्याचे शरीर व मन मजबूत असतं ती व्यक्ती धैर्यवान असते.* अशा व्यक्तीसमोर कुठलीच अडचण राहत नाही. प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा त्याच्यात आत्मविश्वास असतो. याच्या मुळेच त्याच्यात उत्साह निर्माण होतो. हिंदु धर्माचे तत्वज्ञान अशा असमानता व अन्यायपूर्ण सिध्दांतावर अवलंबून आहे की, ज्याच्या मुळे आजपर्यंत कोणालाही उत्साह मिळाला नाही. जर हा धर्म हजार वर्षे जरी जिवित राहिला तर फक्त एवढच होईल की, अशी माणसं तयार होतील जी फक्त स्वतःच पोट भरण्याइतपत पैसे कमावतील. पोट भरण्याशिवाय दुसरं काहीही करु शकणार नाहीत. मग अशा कारकुनांची रक्षा करण्यासाठी मोठ्या कारकुनाची आवश्यकता भासेल. पण यामुळे अस्पृश्यांचा काहीही फायदा होणार नाही.
        
       क्रमशः वाचा
---------------------------------
✒️     मिशनरी
      भिमराव मुनेश्वर.

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य